Ladki Bahin Yojana: राज्यातील लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा प्रतीक्षेची वेळ वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता अद्याप महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. डिसेंबर महिना संपत आला तरीही नोव्हेंबरचा हप्ता न मिळाल्याने अनेक महिलांच्या मनात अस्वस्थता आहे. “नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार, डिसेंबरचाही पैसा मिळणार की नाही?” असे प्रश्न आता राज्यभरातील लाभार्थी महिला विचारत आहेत. Ladki Bahin Yojana
दरम्यान, आता या दोन्ही हप्त्यांबाबत आणखी एक महत्त्वाची चर्चा सुरू झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता लांबणीवर जाण्याची दाट शक्यता असून हे दोन्ही हप्ते थेट जानेवारी महिन्यात जमा होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, जर नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे तिन्ही हप्ते एकत्र दिले गेले, तर पात्र महिलांच्या खात्यात एकरकमी ₹४५०० जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही महिलांना दिलासा मिळेल, मात्र तोपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
डिसेंबरचे शेवटचे अवघे काही दिवस उरले असताना देखील हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्याने संभ्रम कायम आहे. राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू असून मतदानानंतर २१ डिसेंबरला निकाल लागणार आहे. या निवडणूक प्रक्रियेच्या काळात लाभाचे वितरण होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे निवडणूक निकालानंतरच पुढील हालचाली होण्याची शक्यता असून, याच कारणामुळे जानेवारी महिन्यात पैसे जमा होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली असून त्यासाठी ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत केवायसी पूर्ण न करणाऱ्या महिलांना पुढील हप्त्यांचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक महिला सध्या मोबाईल किंवा स्मार्टफोनच्या माध्यमातून ऑनलाइन केवायसी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काही ठिकाणी नेटवर्क, आधार किंवा बँक खात्याशी संबंधित अडचणी येत असल्याने महिलांची धावपळही वाढलेली दिसून येत आहे.
एकीकडे हप्ते लांबणीवर पडलेले, दुसरीकडे केवायसीची अंतिम तारीख जवळ आलेली, अशा परिस्थितीत लाडक्या बहिणींची चिंता वाढत चालली आहे. आता शासनाकडून लवकरात लवकर अधिकृत घोषणा होऊन नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्याबाबत स्पष्टता येते का, याकडे संपूर्ण राज्यातील महिलांचे लक्ष लागले आहे.